श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या
अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्राची माहिती :-
1. माहूर (नांदेड)
महाराष्ट्र (MAHUR) -
हे क्षेत्र
सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती
अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन
महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या
पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हे क्षेत्र फार प्राचीन आहे. ह्या क्षेत्रास
दत्तात्रेयांचे विश्रांतीस्थान सुध्दा म्हणतात. ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ
शक्ती पीठ सुध्दा आहे. हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते. नांदेड पासून 110 किमी अंतरावर
माहूर हे क्षेत्र आहे. पुण्या, मुंबई कडील भक्तांसाठी औरंगाबाद, जालना, मेहकर,
वाशीम, पुसद, माहूर अशी सरळ बस सेवा आहे. नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे
महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे.
---------------------------------------------------------
2. गिरनार
(जुनागड) (सौराष्ट्र, गुजरात) (GIRNAR) -
हे क्षेत्र
गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते. जुनागड या शहरापासून हे
स्थान 02 किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी श्री
सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला. हे स्थान उंच पर्वतावर असून या
ठिकाणी जाण्यासाठी 9999 पायऱ्या चढून जाव्या लागतात. ह्या
ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत. इथे नेहमी दत्तात्रेयांचा
निवास असतो, याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो असे म्हणतात. या ठिकाणी जाण्यासाठी
सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार) साठी नियमीत बससेवा आहे.
रेल्वे-मार्गाने जाणाऱ्या भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद,
राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.
---------------------------------------------------------
3. पिठापूर-
(पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश (PITHAPUR) -
हे क्षेत्र
श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे
जन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात. आंध्रप्रदेशमधे पूर्व गोदावरी
जिल्ह्यात काकीनाड्याजवळ हे क्षेत्र आहे. आपस्तंब शाखेतील अप्पलराज आणि सुमती माता या ब्राह्मण
दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी
श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने
दत्तात्रेयांना भिक्षा वाढली. त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी ‘मी तुझ्या उदरी जन्म घेईल’ असा आशिर्वाद सुमती मातेस दिला. जीवनात
एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे. हैद्राबाद,
विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते, तिथे उतरून रिक्षा अथवा
बसने (10किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला
जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे
आहेत. शिर्डी, विशाखापट्टनम, काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाड्यातून
पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत. पूणे-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर (कोणार्क एक्सप्रेस), तर विदर्भातील
लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ह्या रेल्वेगाड्या सोयीच्या आहेत. या
ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी 12 वाजता आणि रात्री 08 वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. पिठापूरला
जाणाऱ्या भक्तांनी 15 दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची
तारीख संस्थानला फोनने कळवावी. जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळण्यास अडचण निर्माण
होणार नाही.
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम् पिठापूरम् -
संपर्क क्र.- (०८८६९)
२५०३००, २५२३००.
---------------------------------------------------------
4. कुरवपूर
(जि.रायचूर) कर्नाटक (KURAVPUR) -
हे क्षेत्र
कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.
याक्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी
योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार
झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.
याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभांचा साक्षात्कार झाला. मुंबई,
बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे
उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते. तिथे जवळच कृष्णा नदीचा तीर लागतो.
होडीने १ किमी प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते
तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा
नदीच्या तिरावर असलेल्या गावास
जावे लागते. नंतर होडीने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते.
हा मार्ग अधिक सोयीचा आहे. पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त
उपासक विठ्ठल बाबांनी वल्लभपूरम् नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात
निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने
कुरवपूरला जाणाऱ्यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम् या
आश्रमात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच
ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा
आजही पाहावयास मिळतात. कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजाऱ्यांना
भोजनासाठी आधी सांगावे लागते.
वासुदेव भट्ट पुजारी,
श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.
संपर्क क्र.-
(०८५३२-२८०५७०)
भ्रमरध्वनी क्र.-
०९७३१८२७५४६, ०९७४०३१३८२८
---------------------------------------------------------
5.कारंजा (दत्त) (वाशिम) महाराष्ट्र -
हे क्षेत्र
दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री
नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे. आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला
तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती
(टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता. त्या
वाड्यामधे स्वामींचे अस्तित्व जाणवते. हे एकमेव असे
दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती
आहे. इतर क्षेत्री
स्वामींच्या पादुका आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त)
श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.
वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० किमी
अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बससेवा आहे. मुंबई-हावडा या रेल्वे
लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी
अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी 0१ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
श्री गुरुमंदिर
श्री क्षेत्र कारंजा, जि.
वाशिम संपर्क क्र.- (०७२२६)
२२४७५५, २२२४५५
---------------------------------------------------------
6.नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी), कोल्हापूर, महाराष्ट्र -
हे क्षेत्र
कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षांपूर्वी वसले असून,
सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी
महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी या
क्षेत्री १२ वर्षे राहिले. आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या
आहेत. त्यापैकी गुरुचरित्रातील
प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे. (नृसिंह वाडी
पैलतीरी) बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन
परत आणली. त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.
कृष्णानदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे
परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती
(दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर, वासुदेवानंद
सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे. त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त
महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला
गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे. हे क्षेत्र कोल्हापूर पासून
पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे. सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी. अंतरावर
दक्षिणेस हे क्षेत्र आहे. सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस
सेवा आहे. सांगली- कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.
सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे. इथे
निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे. दुपारी १२
वाजता महाप्रसादाची सोय आहे. काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद
उपाध्ये यांनी या ठिकाणी "वेदभवन"या वास्तुचे निर्माण केले आहे. ही
वास्तु सुध्दा अवश्य पाहावी.
श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान,
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर
संपर्क क्र.- (०२३२ २),२७००६४,२७०००६,२७०५०१
---------------------------------------------------------
7.औदुंबर (सांगली, महाराष्ट्र) -
सांगली
जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त
स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे. श्री दत्त
संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती
स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे
स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या १७व्या
अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना
दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व
माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या
वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणाऱ्या भक्तास त्याने केलेल्या पूजेचे अगर
पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील, असे वचन दिले.
औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे.
सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बस मार्गावर हे
क्षेत्र आहे. रेल्वे मार्गांनी प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर
मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी)
अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी
अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.
श्री दत्त संस्थान
श्री क्षेत्र औदुंबर, ता. पुलुस, जि. सांगली.
रामभाऊ पुजारी संपर्क :- (०२३४६) २३००५८, ९९७०१२९७१३,
---------------------------------------------------------
8.गाणगापूर (गुलबर्गा, कर्नाटक) -
गाणगापूर हे क्षेत्र
मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी
आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यासाठी का निवडले या घटनेमागे मोठा
अर्थ आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर
विविध कारणांनी पवित्र झाला आहे. या ठिकाणी पौराणिक काळातील
विभूतींनी तपश्चर्या करून, यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश
परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे. या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.
दत्त भक्तांची अशी भावना आहे की, आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती
भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात. येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची
स्थापना केलेली आहे. हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.
मुंबई-हैद्राबाद (व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बैंगलोर या रेल्वे मार्गावर
गाणगापूर रोड हे स्टेशन लागते. तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर
गाणगापूर या क्षेत्रास जाता येते. बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा
आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछत्र मंडळात सोय
होऊ शकते.
श्री दत्त संस्थान, श्री क्षेत्र गाणगापूर (कर्नाटक).
संपर्क क्र. (०८४७२) २७४३३५, २७४७६८
---------------------------------------------------------
9.माणिकनगर (बिदर,कर्नाटक) -
सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या
ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र
येते. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही
कर्मभूमी आहे. रामनवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्तप्रभुंनी बयाबाईंना
(माणिकप्रभूंची आई) दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल,
असा आशिर्वाद दिला. २२ डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त
जयंतीच्या दिवशी बसवकल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म
झाला. माणिक नगर, बसवकल्य़ाण, बिदर या परिसरामध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला
केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी
गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या
आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि
त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते. त्याचप्रमाणे श्री माणिक
प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक
हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या
घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.
त्यांचे एक वैशिष्ट्य होते की, त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले
नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते. श्री माणिक
प्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते. त्यांचा
एकमेकांचा आपसात परिचय होता. त्यांच्या नेहमी भेटी होत असत. श्री माणिक प्रभूंनी
सकलसंत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या
एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका) हिंदी समाजाच्या एकात्मतेचा
प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला. पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच
तत्वाचा उद्घोष केला. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की, ज्याठिकाणी आजही गादी
परंपरा सुरु आहे. माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि
शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे. अंधशाळा, वेदपाठ शाळा, पब्लिक स्कूल, संगीत
विद्यालय, संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित
असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा
सर्वांगिण विकास केला जातो. असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन
१८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले. हे क्षेत्र सोलापूर पासून
१४० किमी अंतरावर आहे. गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी
(माणिकनगरसाठी) नियमित बससेवा आहे. बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी
अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर) आहे. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून
दुपारी 0१ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
श्री माणिक प्रभू संस्थान,
श्री क्षेत्र माणिकनगर ता.हुमनाबाद जि.बिदर
संपर्क क्र. (०८४८३-२०३२४२), ०९४४८४६९९१३
वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट,
श्री क्षेत्र अक्कलकोट, जि.सोलापूर
संपर्क क्र. (०२१८१) २२०३२१, भक्त निवास संपर्क क्र. -२२१९०९.
---------------------------------------------------------
10.माणगाव (सिंधुदुर्ग,कोकण महाराष्ट्र) -
योगीराज प.पू.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे
स्वामी) यांचे हे जन्मगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण
दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी
माणगावी टेंबे स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते. कारण
गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या
कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता. श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ
दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे
ब्रह्मकमळ. टेंबे स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला.
त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही. त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.
श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य, मंत्रसिध्द, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी,
मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी
सिध्दकवी, वक्ते, हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते. एकच खंत
वाट्ते की, त्यांना संसार सुख लाभले नाही. जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर
पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते. पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी
त्याचा स्वीकार केला. स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या. अशा महान योगीराजाने
गरुडेश्वर येथे १९१४ मधे समाधी घेतली. माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग
जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा
लागतो. तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते.
सावंतवाडीसाठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास
असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.
दत्तमंदिर, श्री क्षेत्र माणगाव, ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग
(कोकण)
संपर्क क्र. (०२३६२) २३६२४५, २३६४२५
---------------------------------------------------------
11.श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा,कर्नाटक) -
वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे
लेखन कडगंची येथे झाले. हे स्थान प्रसिध्दीस नव्हते. परंतु आता श्री सायंदेव
दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. गाणगापूर पासून ३४ किमी. अंतरावर
हे पुण्य स्थान आहे. सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ
भक्त होता. त्याच्याच ५व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. श्री
सिध्द मुनींनी सांगितलेला आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला तोच पवित्र गुरुचरित्र ग्रंथ
होय. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा
उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय. सायंदेवाचे घराचे
जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे. येथील श्री
दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.
श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती,
श्री क्षेत्र कडगंची, ता.आळंद, जि.गुलबर्गा, कर्नाटक
संपर्क क्र.- (०८४७७) २२६१०३, ९७४०६२५६७६
---------------------------------------------------------
12.मंथनगड (मंथनगुडी) महेबुब नगर, (आंध्रप्रदेश) -
श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा
प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरवपूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी
त्यास अडवून त्याची हत्या केली. त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार
संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय
शिष्यास परत जिवंत केले, तेच हे ठिकाण. हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून
हे क्षेत्र १० किमी. अंतरावर आहे. मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर
बस मिळतात. मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात. श्री क्षेत्र
कुरवपुरला मतकल मार्गे जातांना अगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन
श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घ्यावे.
---------------------------------------------------------
13.गरुडेश्वर (नर्मदा,गुजरात) -
हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा
जिल्ह्यात येते. सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते. तिथे उतरून
बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ किमी अंतरावर आहे. राजपिपला हे
तहसीलचे गाव आहे. शिरपूर-बडोदा, धुळे-बडोदा या बसेस राजपिपला मार्गे बडोद्याला
जातात. त्यामुळे महाराष्ट्रातून गरुडेश्चरला जाणाऱ्या भक्तांसाठी शिरपूर
किंवा धूळे येथून जाणे सोयीचे पडते. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची
समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या
स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. एक अपत्य
झाल्यावर पत्नीसह बालकाचे निधन झाले. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्त अवतार
असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला. असे महान योगी
सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले. दत्त संप्रदायामधे
स्वामींचे नाव आदरने घेतले जाते. याठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे व दुपारी १२
वाजता महाप्रसादाची सोय आहे.
श्री दत्त संस्थान, श्री क्षेत्र गरुडेश्वर,
जि.नर्मदा, गुजरात संपर्क क्र.- (०२६४०) २३७००५, २३७०६५)
---------------------------------------------------------
14.कर्दळीवन -
आपल्या अवतार समाप्ती नंतर श्री नृसिंह
सरस्वती याच कर्दळीवनात गुप्त झाले व येथेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट
झाले. हे ठिकाण नेमके कोठे आहे, याची माहिती आताच देणे संयुक्त नाही, कारण मागील
काही वर्षापूर्वी कर्दळीवन म्हणून प्रकाशझोतात आलेले, आंध्रप्रदेश मधिल श्री
शैल्यम् जवळील कर्दळीवन हे मुळचे कर्दळीवन नाही, यांचा खुलासा काही दिवसापूर्वी
झाला असल्याने व मुळचे कर्दळीवन हे पश्चिम बंगालच्या आसपास असल्याचे काहिंचे
म्हणणे असल्यामुळे यावर आताच बोलणे योग्य नाही. जेव्हा कर्दळीवन नेमके कोणते खरे
आहे व ते कोठे आहे, याची योग्य माहिती मिळेल, तेव्हा ती माहिती आपल्यासमोर मांडली
जाईल.
॥ जय गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु॥